नाशिक: वैद्यकीय क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि अवयवदानाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र अर्थात मविप्र रुग्णालयात इतिहासात प्रथमच अत्यंत गुंतागुंतीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. येवला तालुक्यातील विसापूर येथील रहिवाशी असलेल्या दिवंगत विठाबाई सोनवणे यांच्या अवयवदानातून मिळालेल्या एका किडनीचे मविप्र रुग्णालयातच एका गरजू रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी दिली.
येवला येथील विठाबाई सोनवणे या मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत धाडसी आणि सामाजिक भान राखणारा निर्णय घेतला. विठाबाईंचा मुलगा दत्तू प्रकाश सोनवणे आणि मुलगी दिपाली आहेर यांनी दुःखद प्रसंगी संयम राखत अवयवदानाला परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयामुळेच मविप्र रुग्णालयाच्या इतिहासातील पहिल्या किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला आणि एका रुग्णाला नवजीवन मिळाले.
शासनाच्या झेडटीसीसी च्या नियमावलीनुसार आणि अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगाने राबवण्यात आली. मविप्र रुग्णालयातील सर्जरी विभाग, मेडिसिन विभाग, भूलशास्त्र विभाग आणि ट्रान्सप्लांट टीममधील डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफच्या पथकाने यासाठी अहोरात्र विशेष परिश्रम घेतले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील सेवक बापू सोनवणे यांनी नातेवाईक आणि रुग्णालयाचा समन्वय करून मोलाचे सहकार्य केले. नाशिक जिल्ह्यातच अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने रुग्णांना आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही, यावर अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी सांगितले .
प्रतिक्रिया (कोट)
“दिवंगत विठाबाई सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले सामाजिक भान आणि घेतलेला अवयवदानाचा निर्णय अत्यंत वंदनीय आहे. मविप्र रुग्णालयात प्रथमच पार पडलेली ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आमच्या वैद्यकीय चमूच्या कौशल्याची पावती आहे. अवयवदान ही काळाची गरज असून, एका व्यक्तीचे अवयवदान अनेकांचे आयुष्य प्रकाशमान करू शकते. अवयवदानाच्या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, हेच खऱ्या अर्थाने मानवतावादी कार्य ठरेल.” — ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक.








